स्त्री भूमिका पुरुषांनीच करण्याच्या काळात अशा भूमिका करणाऱ्या पहिल्या अभिनेत्री कमलाबाई कामत-गोखले यांचा सहा सप्टेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
.......
सहा सप्टेंबर १९०१ रोजी कमलाबाई कामत यांचा जन्म झाला. कमलाबाई यांचे वडील उत्तम कीर्तनकार होते, तर आई दुर्गाबाई कामत आवडीने सतार वाजवत. त्यामुळे कानावर सतत सुरेल स्वर आणि मंजुळ स्वर ऐकतच कमलाबाई लहानाच्या मोठ्या होत होत्या; पण घरची स्थिती हलाखीची असल्याने अवघ्या पाचव्या वर्षापासून कमलाबाईंनी मेळा, तसंच जत्रांमधून कामं करायला सुरुवात केली. याच मेळ्याच्या माध्यमातून संवाद, संगीत आणि अभिनयाचे धडे त्यांनी गिरवायला सुरुवात केली. याचा उपयोग कमलाबाईंना पुढे मूकपट, तसेच संगीत नाटकांसाठी झाला.
भारतीय सिनेसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेली ती २०व्या शतकाच्या आरंभी. त्या काळी आपल्या समाजात प्रबोधन आणि मनोरंजनाचं महत्त्वपूर्ण साधन म्हणजेच संगीत नाटक. वैविध्यपूर्ण विषय, सजीव अभिनय, सामान्य माणसाच्या काळजाला भिडणाऱ्या कथानकांमुळे, नाटकं मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनली होती; पण त्या काळी या नाटकांमध्ये स्त्री भूमिकाही पुरुष साकारत असत. याच काळात म्हणजे १९१३ साली चित्रपट युग सुरू झाले ते राजा हरिश्चंद्रपासून.
त्या बोलपटाच्या यशानंतर दादासाहेब फाळकेंच्या मोहिनी भस्मासुर या मूकपटाचा प्रयोग सुरू झाला होता. आपल्या आगामी बोलपटांमध्ये स्त्री पात्रे ही स्त्री कलाकारांनी साकारावीत या मताचे दादासाहेब फाळके होते. त्याच वेळी कोणीतरी कमला कामत नावाच्या लहान मुलीचं नाव दादासाहेब फाळकेंना सुचवलं. फाळकेंच्या मोहिनी भस्मासुर या मूकपटात मोहिनीच्या व्यक्तिरेखेसाठी कमलाबाईंची निवड झाली आणि त्यांच्या रूपानं रूपेरी पडद्याला एक स्त्री अभिनेत्रीचा, स्त्री कलाकाराचा चेहरा मिळाला. विशेष म्हणजे मोहिनी भस्मासुर या चित्रपटात कमलाबाईंच्या आई दुर्गाबाई कामत यांचीसुद्धा पार्वतीच्या छोट्या भूमिकेसाठी निवड झाली. सर्व स्तरातून या भूमिकेचं स्वागत झालं आणि पुढे कमलाबाईंच्या अभिनयाची कमान चढतीच राहिली.
पुढे अनेक मूकपटांमधून परिपूर्ण भूमिका साकारून त्यांनी स्त्री कलाकारांना एकाअर्थी या क्षेत्रात येण्यासाठी हे उदाहरण आपल्या रूपानं ठेवलं असंही म्हणता येईल. चित्रपटांपेक्षाही तो काळ नाटकांचाच होता. पण अशा वेळी संगीत नाटकांतील महत्त्वपूर्ण अशी किर्लोस्कर कंपनी बंद पडल्यानं, रघुनाथराव गोखले यांनी चित्ताकर्षक नाटक मंडळीची स्थापना केली आणि गद्य नाटके रंगभूमीवर सादर होऊ लागली. या नाटकांमधून कमलाबाईंनी भूमिका साकारल्या; पण अशातच रघुनाथरावांचे निधन झाले आणि रामभाऊ गोखले यांच्याकडे ‘चित्ताकर्षक’ची सूत्रे आली. त्यांनी पुन्हा संगीत आणि पौराणिक नाटकांची निर्मिती सुरू केली.
पुंडलिक, तसेच मृच्छकटिक ही नाटकं ‘चित्ताकर्षक’तर्फे सादर होऊ लागली होती. या नाटकांमधून कमलाबाईंनी प्रमुख भूमिका केल्या. त्यामुळे नाट्यसंगीतालाही सुरेल बाज लाभला. ‘चित्ताकर्षक’चे मालक राजाभाऊ गोखले यांच्याबरोबर विवाहबद्ध होऊन त्या कमलाबाई गोखले झाल्या. पती-पत्नी दोघेही एकाच क्षेत्रातले असल्यानं त्यांचं बिऱ्हाडही सतत फिरत राहिलं. पण दुर्दैवाने चित्ताकर्षक मंडळी नुकसानीत आल्यानं कंपनीला टाळं लागलं. अनेक प्रश्न भेडसावत होते; पण कमलाबाईंनी हार मानली नाही. त्यांनी मनोहर स्त्री संगीत मंडळी नावाची संस्था स्थापन केली. या काळात फक्त स्त्रियांची नाट्यकंपनी असणं हे कला आणि मनोरंजन सृष्टीसाठी सूचक असं पाऊल होतं आणि या नाट्यकंपनीचं वैशिष्ट्य हेच की स्त्री आणि पुरुषांची पात्रं स्त्रियाच सादर करत.
या सुमारास नाट्यकलाप्रसाद या नाट्यकंपनीनं अस्पृश्यता निवारण हा सामाजिक प्रश्न रंगभूमीवर आणला, ज्या विषयाचा उच्चार करणंही धाडसाचं होतं, ते ‘उ:शाप’च्या माध्यमातून जनतेसमोर आले. कमलाबाईंनी काळाची गरज ओळखून या नाटकात समर्थपणे भुमिका साकारली. पेशव्यांचा पेशवा या ऐतिहासिक नाटकातली त्यांची आनंदीबाईची भूमिका, सौभद्रमधील सुभद्रा व अर्जुन, मानापमानमधील धैर्यधर (पुरुषपात्र) या व्यक्तिरेखा तर गाजल्याच; पण विश्राम बेडेकर, मामा वरेरकर, प्रबोधनकार ठाकरे यांसारख्या नामवंत लेखकांच्या नाटकांमधून कमलाबाईंनी प्रत्येक व्यक्तिरेखेला जिवंतपणा प्राप्त करून दिला.
तब्बल २००हून अधिक नाटकं, मूकपट, त्यासोबतच कारकिर्दीत ३५ पेक्षाही अधिक चित्रपटांतून नायिका, तसेच स्त्रीप्रधान भूमिकांमुळे कमलाबाई गोखले कायमच लक्षात राहतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आणि चाळीस वर्षं या क्षेत्रासाठी योगदान दिल्याबद्दल, त्यांचा वयाच्या ७०व्या वर्षी दिलीपकुमार यांच्या हस्ते सत्कार झाला. रीना मोहन या बंगाली दिग्दर्शिकेने हिंदीमध्ये त्यांच्यावर टेलिफिल्मही बनवली. चंद्रकांत गोखले, लालजी गोखले व सूर्यकांत गोखले ही त्यांची तीन मुले. लालजी गोखले आणि सूर्यकांत गोखले हे दोघे तबलावादक होते. चंद्रकांत गोखले यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या कलेचा वारसा अभिनयातून आपल्यासमोर आणला आणि विक्रम गोखले यांच्या रूपात आज कमलाबाईंची तिसरी पिढी या क्षेत्रात समर्थपणे कारकीर्द घडवतेय. कमलाबाईंचे निधन १८ मे १९९७ रोजी झाले.
(संदर्भ : सागर मालाडकर)
(माहिती संकलन : संजीव वसंत वेलणकर)